blog Images

शत्रूंच्या तब्बल १० रणगाड्यांची दाणादाण उडविणारा पराक्रमी वीर 'अरुण खेतरपाल'

30 September 2022

 १९७१ साली झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या परिणाम स्वरूप बांग्लादेश पाकिस्तानातून वेगळा होऊन एक स्वतंत्र देश झाला होता. भारताच्या इतिहासातच नाहीतर जगाच्या इतिहासात देखील, या युद्धाची नोंद आहे. या युद्धात भारतीय सैनिकांनी आपल्या शौर्य व असामान्य कामगिरीतून पाकिस्तानला पराभूत केले होते. युद्धातील महत्वाच्या शूरवीर शिलेदारांपैकी एक होते सेकंड लेफ्टनंट अरुण खेतरपाल ! 

  १९७१ च्या युद्धाची गोष्ट निघाली की, अरुण खेतरपाल हे नाव व त्यांचा पराक्रम डोळ्यासमोर उभा राहतो. भारत पाकिस्तान युद्धात असामान्य कर्तृत्व गाजवत अरुण खेतरपाल शहीद झाले होते. शत्रूच्या उपस्थितीत त्यांनी दाखवलेल्या शौर्यामुळे त्यांना मरणोत्तर परमवीर चक्र देऊन गौरविण्यात आले होते. वयाच्या अवघ्या २१व्या वर्षी त्यांना हा सन्मान मिळाला होता. 

  भारत पाकिस्तान युद्ध सुरू झालं होते, या काळातच खेतरपाल इंडियन मिलिटरी अकॅडमीमधून प्रशिक्षित होऊन निघाले होते. युद्धात सहभागी होण्याची इच्छा स्वतः अरुण यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडं केली. १६ डिसेंबर १९७१ रोजी युद्धानं गंभीर रूप धारण केलं होतं. अरुण खेतरपाल हे सुद्धा यात सहभागी झालेले होते. त्यावेळी २१ वर्षांचं तरुण सळसळतं रक्त असलेल्या अरुण यांनी रौद्ररूप धारण करीत दणादण शत्रूचे रणगाडे उडवण्यास सुरुवात केली. 

 खेतरपाल यांना त्याचे सहकारी परत बोलवत असताना देखील, ते शत्रूपक्षाच्या रणगाड्यांचा धुव्वा उडवत पुढे जात होते. एक दोन नाहीतर, तब्बल १० रणगाडे त्यांनी उडवले होते. पाकिस्तानला त्यांनी पुढे सरकू तर दिलेच नाही. शत्रूला एकट्या खेतरपाल यांना रोखण्यासाठी अजून एक बटालियन बोलवावी लागली होती. 

  अरुण यांनी उडवलेला शेवटचा रणगाडा हा त्यांच्यापासून १०० मीटर दूर होता. जेव्हा अरुण यांना परत येण्याचा आदेश मिळाला, तेव्हा त्यांनी एक संदेश देत रेडिओ सेट ऑफ केला, 'सर माझी बंदूक अजूनही फायरिंग करत आहे, जोवर बंदूक फायरिंग करत राहील, मी फायरिंग सुरू ठेवेन.' शेवटी अरुण शहीद झाले. देशाला मात्र युद्धात विजय मिळाला. याच युद्धात अरुण यांचे वडील ब्रिगेडियर एमएल खेतरपाल हे देखील शत्रूंसोबत लढत होते.
  अरुण यांच्या हौतात्म्यानंतर ते ज्या टँकमध्ये बसून लढत होते, तो टँक आजही अहमदनगर येथे सुरक्षित ठेवला आहे. एनडीएमध्ये त्यांच्या नावाने परेड ग्राउंड आहे, तर आयएमएमध्ये त्यांच्या नावाने सभागृह तयार करण्यात आले आहे. 

 पाकिस्तानसोबत १९७१ चं युद्ध आपण का जिंकू शकलो? याची कल्पना अशा पराक्रमी वीरांच्या कथा वाचल्यावर आपल्याला येते. अरुण खेतरपाल यांच्यासारख्या जीवाची बाजी लावणार्याथ वीर योद्धयांच्या शौर्य व बलिदानामुळं आपल्या देशावर वाकडी नजर ठेवणार्यांजना धडकी भरते. भारतमातेच्या या निर्भय, शूरवीर सैनिकाला डिफेन्स करिअर अकॅडमीचे विनम्र वंदन !